Tuesday, August 23, 2011

सैतान (?? !!!!)

- अण्णा हजारेंचं आंदोलन म्हणजे सगळा चुकीचा प्रकार आहे.

- सगळा सावळा गोंधळ आहे नुसता. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.

- जे चाललंय ते सगळं चुकीचं चाललंय.

- अण्णांना पाठींबा देण्यासाठी गर्दी करणाऱ्यांपैकी किती जणांना लोकपाल म्हणजे काय हे माहिती आहे?

- आणि समजा लोकपाल विधेयक आलं तर काय दुसऱ्या दिवसापासून भ्रष्टाचार बंद होणार आहे का?

- आंदोलनं अशी एसएमएस पाठवून आणि "मी अण्णा आहे" च्या टोप्या घालून मिरवून यशस्वी झाली असती तर काय हवं होतं !!

- अण्णांना मिडियाने हिरो केलंय बाकी काही नाही.

- या आंदोलनाला काही दिशा नाही की कसलं प्लानिंग नाही.

- क्रांती अशी पंधरा दिवसांत होत नाही !!

- अण्णा स्वतःचा वैयक्तिक अजेंडा राबवताहेत.

- बेदी आणि केजरीवाल स्वतःचे वैयक्तिक अजेंडे राबवताहेत

- अण्णांच्या आंदोलनामागे कोणाचे आणि काय छुपे उद्देश आहेत हे तिथे येऊन त्यांना पाठींबा देणाऱ्या एकाला तरी माहिती आहे का?

- अण्णांच्या जुन्या आंदोलनांमधले कुठलेही सहकारी त्यांच्या या आत्ताच्या आंदोलनामध्ये अण्णांबरोबर का नाहीयेत?

- अण्णा हे स्वतःचंच म्हणणं खरं करणारे आणि हट्टी आहेत.

- आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या किती जणांनी आत्तापर्यंत कधीच लाच दिलेली नाहीये?

- या आंदोलनात गरीबांचा सहभाग अजिबात नाहीये.

- हे आंदोलन म्हणजे जनतेच्या डोळ्यात पद्धतशीरपणे धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे.

- हे आंदोलन केजरीवाल आणि बेदींनी हायजॅक केलंय आणि ते म्हणतील तसेच निर्णय घेतले जातायत.

- अण्णांचे उद्देश कदाचित योग्य असतीलही पण मार्ग मात्र साफ चुकलाय.

- अण्णा उपोषणाच्या धमक्या देऊन सरकारला वेठीला धरू पहातायत जे साफ चूक आहे.

- सरकार थोडं झुकायला तयार आहे मग अण्णांनीही थोडं नरमाईने घ्यायला हवं.

- अण्णांनी पूर्वीची उपोषणं इलेक्ट्रॉलची पावडर घेऊन केली आहेत म्हणे. (अशा पावडरी घेऊन तर मीही उपोषण करू शकेन आणि तेही वर्षभर)

- अण्णा वाटाघाटीत लगेच नमतात हा पूर्वेतिहास आहे.

इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी..


-----------------------------------------------------

जुलुमी इंग्रजी सत्तेचा बिमोड करून भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मला प्रसंगी सैतानाची मदत घ्यावी लागली तरी ती मी घेईन आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देईन.

- नेताजी सुभाषचंद्र बोस

-----------------------------------------------------

अण्णा कदाचित हट्टी आणि दुराग्रही असतीलही, कदाचित त्यांचा मार्ग चुकला असेल, कदाचित त्यांचं आंदोलन मिडिया आणि विरोधी पक्षांनी मॅनेज केलं असेल किंवा हे एवढेच नाही तर वर लिहिलेले सगळे मुद्दे आणि अण्णांवर केले गेलेले सगळे आरोप खरे असतीलही पण तरीही... हो हो तरीही माझा अण्णांना संपूर्ण पाठींबा आहे. कारण त्यानिमित्ताने का होईना सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, कुठल्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय एकत्र आला, आपण कितीही आणि कितीही करोडोंचे घोटाळे करू शकतो आणि फसव्या कमिट्या नेमून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू शकतो या कॉंग्रेस सरकारच्या अपसमजाला जनतेने अजाणतेपणे आणि न ठरवता का होईना धक्का दिला, सरकारला अक्षरशः उघडं पाडलं, त्यांना पळताभुई थोडी केली, (सोनिया नावाचा) रिमोट कंट्रोल नसेल तर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं सरकार चालवणाऱ्या मुठभर तथाकथित बुद्धिवादी राजकारण्यांची कशी तारांबळ उडते याचं भयानक आणि वास्तव चित्र अण्णांना पाठींबा न देणाऱ्या 'इंटरनेट इंटलेक्च्युअल्स' समोर मांडलं !!!!

आणि हे सगळं बघताना मला वैयक्तिक आनंद होतोय.... अगदी आसुरी आनंद.. कितीही घोटाळे केले तरी घोटाळेबाज मंत्र्यांच्या केसांनाही धक्का न लावणाऱ्या सरकारची अशी गलितगात्र अवस्था बघून मला खरंच भयानक राक्षसी आनंद होतोय.. एक सूड घेतल्याचा आनंद मिळतोय. म्हणून म्हटलं भलेही लोकपाल विधेयक आल्याने किंवा हे अशा प्रकारचं आंदोलन केल्याने भ्रष्टाचार नाहीसा झाला नाही तरी चालेल पण सरकारची पाचर मारता येऊ शकते, भ्रष्टाचाराने पिचलेली जनता सरकारच्या अवघड जागचं दुखणं ठरू शकते ही कल्पनाच कसली सुखावह आहे !!! राहुल, मनमोहन, चिद्या, अहमद, अँटोनी यांच्या साल्या रातीच्या निंदा (झोपा हो) हराम झाल्यात, सगळे एकजात पायात शेपूट घालून अण्णांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या तंबूचे उंबरठे झिजवताहेत ही वस्तुस्थिती अपार सुख देणारी आहे. हर्शोन्मादात चिंब भिजवणारी आहे.

साला पुढचा भ्रष्टाचार करताना, घोटाळे करताना, ते निर्लज्जपणे दाबून टाकताना, कोणाच्या बापाची भीती नसल्यागत बेलगामपणे हिंडणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या डुकरांना क्षणभर जरी अण्णांची, या आंदोलनाची, विशाल जनसमुदायाची आठवण झाली आणि त्या दहशतीने पुढच्या घोटाळ्यांची साईज पाच टक्क्यांनी जरी कमी झाली तरी माझ्या दृष्टीने ते प्रचंड मोठं यश आहे. आणि त्यासाठी सुभाषबाबू म्हणतात त्याप्रमाणे सैतानाची, राक्षसाची मदत घ्यावी लागली तरी माझी हरकत नाही. माझा त्यांना पाठींबाच असेल !!!

65 प्रतिक्रिया:

सुहास said...

यानिमित्ताने का होईना सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, कुठल्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय एकत्र आला, आपण कितीही आणि कितीही करोडोंचे घोटाळे करू शकतो आणि फसव्या कमिट्या नेमून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू शकतो या कॉंग्रेस सरकारच्या अपसमजाला जनतेने अजाणतेपणे आणि न ठरवता का होईना धक्का दिला, सरकारला अक्षरशः उघडं पाडलं, त्यांना पळताभुई थोडी केली .... +१

मी फक्त मिडीयाच्या स्टंटबाजीने पुरता हैराण झालोय, कारण त्यांच्यामुळे आंदोलनाला प्रचंड हवा मिळतेय, पण क्षणार्धात इतकी हवा मिळून आंदोलनामधली हवा निघून जाऊ नये हिचं इच्छा. अण्णा करत आहेत त्याला माझा पुर्ण पाठींबा आहे, पण त्यांच्या नावाखाली इतर मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत याचेच वाईट वाटते :(

शंतनू देव said...

Heramb. Ekdum direct dil se lihila aahes. 1100% patla

अनघा said...

'पुढचा भ्रष्टाचार करताना, घोटाळे करताना, ते निर्लज्जपणे दाबून टाकताना, कोणाच्या बापाची भीती नसल्यागत बेलगामपणे हिंडणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या डुकरांना क्षणभर जरी अण्णांची, या आंदोलनाची, विशाल जनसमुदायाची आठवण झाली आणि त्या दहशतीने पुढच्या घोटाळ्यांची साईज पाच टक्क्यांनी जरी कमी झाली तरी माझ्या दृष्टीने ते प्रचंड मोठं यश आहे.' + १
तसेच...
जर आता कोणापुढे नोटा नाचवताना आपणही थोडे बिचकू लागलो...
सर्रास सिग्नल तोडताना हे आपण भ्रष्ट्राचाराला पोषक वातावरणच तयार करीत आहोत ह्याची जाणीव झाली...
तो घेतो...तेव्हा मी देतो...आणि हा अधिक मोठा गुन्हा आहे...हे प्रत्येकाने समजून घेतले...
तर तो माझ्यासाठी सर्वात मोठा फायदा आहे.

Dhiraj Bhole said...

सगळे किव्वा काही आरोप खरे असतीलही अस जे बोलतायेट त्यात मला काही तथ्य वाटत नाही....ही व्यक्ती स्वच्छ चरित्र्याचा आणि सारासार विचार करणारा आहे, जी गोष्टा माहीत नसेल आणि गरजेची आहे ती चटकन माहीत करून घेउनच त्यावर अण्णा बोलतात...त्यांच्या आजूबाजूचे लोक बघितले तरी त्यांच्यावर पण आरोप करवेसे पण वाटत नाही, अरविंग केजरिवल जे मॅग्सेसे अवॉर्ड विनार आहे, किरण बेदी ज्या फॉर्मर ऑफीसर आहेत आणि इतर सर्व, या सर्वांनी ठाम मत केलय की या देशाच्या भल्यासाठी जे शक्या होईल ते करायच...मला तर आरोप करायला पण लाज वाटेल त्या व्यक्तीं वर....आपण संपूर्ण सहभाग घ्यायलाच पाहिजे अश्या चळवळीत...या चळवलीतून लोक पण बदलतील, त्यांच्यात पण भ्रष्टाचार करायचा नाही अशी भावना निर्माण होईल...

Gouri said...

सुपरलाईक!
इतके दिवस भ्रष्टाचाराच्या बातम्या नुसतेच वाचणारे लोक अण्णांमुळे रस्त्यावर उतरलेत निषेध नोंदवायला ... हे काय कमी आहे?
जगाच्या इतिहासात आजवर कुठलं आंदोलन १००% लोकांच्या सहभागाने, १००% सहभागींच्या एकमताने झालंय?
करू देत ना मिडियाने आंदोलनाला मोठं ... मी तर म्हणीन की कधी नाही ते आपले मिडियावाले त्यांचं काम नेकीने करताहेत. उगाच गणपती दूध पीत असल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी बरं.
आंदोलन हायजॅक होईल का? अण्णा वाटाघाटींमध्ये कमी पडतील? लोकांचा भ्रमनिरास होईल? जन लोकपालमुळे नवे प्रश्न उभे राहतील?
काहीही झालं तरी पुढचा लाखो - करोडोंचा घोटाळा पाठीशी घालताना दहा वेळा विचार करावा लागेल सरकारला ... हेही नसे थोडके!

Gaurav said...

सगळे मुद्दे पटले, वरती नमुद केलेले सगळॆ प्रश्न आणि खालचे स्पष्टीकरणसुद्धा.. infact मला तर वाटते (कदाचित चुकीचेपण असेल) लोक एकत्र झालीयेत ती कॉंग्रेस सरकारच्या विरुद्ध, लोकपाल एक कारण आहेच पण सरकारविरुद्धचा राग हे एक मोठे कारण आहे. आणि राहुल, मनमोहन, चिद्या, अहमद, अँटोनी आणि सिब्बल यांच्याबद्दल म्हणाल तर त्यांची उतरलेली तोंडे आणि त्यांनी घातलेली शेपुट बघुन खरच आसुरी आनंद झाला. अरुण जेटलींच्या राज्यसभेतल्या भाषणाच्या वेळेसच मनमोहन सिंह आणि मंडलींची झालेली अवस्था बघुन खुप मजा आली.

आनंद पत्रे said...

+१ संपुर्ण पटलं

विशाल said...

२००% सहमत !
शब्द न शब्द पटला मित्रा !!

भानस said...

हेओ, वरचे सगळे मुद्दे बरेचदा मनात डोकावलेतच. खरेच किती जणांना लोकपाल विधेयकात काय लिहीलेय हे माहीत असेल.... किंवा किती जणांनी जाणीवपूर्वक ते माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला असेल... ??

जसे वरचे मुद्दे पटले तद्वतच भाग दोनही. किंबहुना जास्तीच भिडला. निदान जनता आता केवळ मेंढर स्वरुपात राहीलेली नाही हे तरी सरकारला कळले. सगळे +१.

काहीही झालं तरी पुढचा लाखो - करोडोंचा घोटाळा पाठीशी घालताना दहा वेळा विचार करावा लागेल सरकारला ... आणि जाबही द्यावा लागेल. फक्त आता अण्णांनी अवसान घात करू नये म्हणजे मिळवली.

सिद्धार्थ said...

पाठिंबा तर आहेच. आणि हेतू, मार्ग कुठलाही असो सरकारची चांगली वाजवत आहेत हे पाहून "काहीतरी होऊ शकत" ही नव्याने आलेली भावना सुखद आहे.

Vikrant Deshmukh... said...

आणि यात माझ्या सगळ्यात जास्ती डोक्यात जातोय तो षंx मनमोहन सिंग !
एवढा दुबळा पंतप्रधान आधी कधी झाला नव्हता !!
त्याला कसली सुवर्णसंधी होती इतिहासात अजरामर व्हायची.... एक राजीनामा फेकून दिला असता तोंडावर आणि सत्याच्या बाजूने उभा राहिला असता तर हिरो ठरला असता... पण या माणसाला काय झालंय काही कळत नाही !!

jivanika said...

अगदी खरं, पूर्ण सहमत
शेवटी नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाहीच.
गेले ४० वर्ष जे लोकपाल बिल पडून होत त्याबद्दलची जागरुकता तर आली लोकांमध्ये, मग ते कोणत्याही मार्गाने का असेना.
आणि अण्णा हट्टी, दुराग्रही असतील, पण याच हट्टामुळे चांगल्या गोष्टी घडताहेत, घडल्या आहेत.
कधी नव्हे ते वंदे मातरम च्या घोषणा होत आहेत. हेही काही कमी नाही. शिवाय आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जगात इतरत्र हिंसक आंदोलने होत असताना या देशातील तरुण पिढी अहिंसात्मक पद्धतीने सरकारचा विरोध करते आहे. नाहीतर इतर वेळी सरकारला विरोध म्हणजे सरकी मालमत्तेची जाळपोळ हेच समीकरण होत.

K2 said...

तुझ्या मताशी पूर्णपणे सहमत. मात्र अमूक पक्षाचं सरकार आहे म्हणून विरोध करायचा यासाठी अण्णांना पाठिंबा देणारांनी हे देखील लक्षात घ्यायला हवं की ते ज्या पक्षाचे समर्थक आहेत, त्यांचेही हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेतच. सामान्य माणूसदेखी भ्रष्टाचारी असतोच. साधं उदाहरण - बिल्डींगचा वॉचमन एरव्ही सेल्समनला बिल्डींगमधे शिरू देत नाही पण तेच फळवाले, चणे-दाणेवाले सहज आता येऊ शकतात कारण बिल्डींगमधे शिरण्यासाठी त्यांनी वॉचमनला फळ/चणे असा कट दिलेला असतो. लोकपाल बिल पास झालं, तर भारतासारखा दुसरा आदर्श देश नसेल याची मला १०१% खात्री आहे. मला अपेक्षादेखील याचीच आहे पण हे देखील तितकंच खरं की लोकपाल बिल पास झालं तर देशभरात सर्वात आधी दंगली उसळतील. कुणी कुणाला धरायचं याच्यातच वेळ जाईल, कारण कुणाला सोडलं की भ्रष्टाचार झालाच! धरण्यासाठी कारणं शोधली जातील, नसतील तर निर्माण केली जातील.

मिडीया, सामान्य माणूस, राजकारणी, सगळे सगळेच भ्रष्टाचारी आहेत. ते म्हणतात ना, "पीपल गेट द गव्हर्नमेंट दे डिझर्व्ह." इथे पॉलिटीकल पार्टीचा प्रश्नच येत नाही. एक गेली तर दुसरी येईल आणि सामान्य माणसाला मुळात अण्णा लागतातच का? जपानच्या भूकंपाचं उदाहरण ताजं आहे अजून. तिकडच्या सामान्य माणसाने शिस्तीचं अनोखं उदाहरण जगापुढे ठेवलं. त्यांच्याकडे एक अण्णा हजारे नव्हते, ते सगळेच अण्णा हजारे होते म्हणून हे घडलं. हे आपल्याकडे घडत नाही, घडेल असं वाटत नाही. सामान्य माणूस आज अण्णांसाठी, अण्णांमुळे कुठल्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय रस्त्यावर उतरलाय. उद्या याच सामान्य माणसाने आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी अण्णांना दोषी न ठरवो, म्हणजे झालं.

सॉरी, प्रतिक्रिया खूप मोठी झालीय. माझी प्रतिक्रिया चुकीची वाटू शकेल पण बोलल्याशिवाय रहावलं नाही.

Harshal Jain said...

पूर्णपणे सहमत. कोणीतरी काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला पण काही लोक उगाच काड्या करतात ते पण केवळ विरोधाला विरोध म्हणून आणि आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध आहोत हे दाखवण्यासाठी.

BinaryBandya™ said...

मस्त लिहिले आहेस ..

मी तो video पहिला होता. बाबा आढाव वगैरे अण्णाबद्दल काय काय बोलत होते. काय खरे आणि काय खोटे देव जाणो.

पण तरीही आमचा पाठींबा आहे ह्या आंदोलनाला हे सगळ्यात महत्वाचे :)

लिना said...

'टु द पॉंइन्ट' रे एकदम...
राजकारण्यांनी काहीही केलं तरी जनता मूकपणे सहन करते ह्या विचाराला फोडण्याच काम हे आंदोलन करतंय...त्यामुळे आपलाही पाठींबा आहे...

aativas said...

Only problem is: only politicians are not corrupt, we too are; everyoe as his/her authority allows. And I wish that IAC really puts the responsibility on our shoulders too!

davbindu said...

माझा काँगेस सरकारला अत्यंत विरोध असला तरी अण्णांना माझा पूर्ण पाठिंबा नाहीये.कारण सर्वसामान्यांना जन लोकपालाच्या जोरावर ज्या भारताची अण्णा समर्थक स्वप्न दाखवत आहेत,तो असा जादूची कांडी फिरवल्यासारखा पटकन होणार नाहीये.शिवाय अण्णा टीमचा नक्की हेतू काय आहे हे ही आता सांगता येत नाही कारणं हे आंदोलन एकटे अण्णा चालवत नाहीत खूप हुशार डोकी ह्यामागे कार्यरत आहेत ,त्यांचा उद्देश काही वेगळा तर नाही ना ..(ही शंका ह्यासाठी कि ते म्हणतात ना एकदा दुधाने तोंड भाजल कि ताकही फुंकून प्यायला लागतो आपण )
तरीही कोटी कोटी रूपयांचा भस्म्या झालेल्या ,सरकारी तिजोरीची वारेमाप लुट करणार्या ,अगदी बेलगाम झालेल्या कॉग्रेसच्या नेत्यांना अण्णांनी लोकांना संघटीत करून चांगलाच लगाम घातला.आणि ह्या गोष्टीचा 'आसुरी' आनंद मी ही घेतो आहेच...त्याबद्दल अण्णांचे कौतुक करावे तितके कमी आहे.आणि त्यासाठीच अण्णांच्या बरोबर राह्वेसे वाटते.पण त्यांनी लोक जी स्वप्न पाहत आहेत त्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काय करायचं आहे आहे हे ही स्पष्ट कराव.खरतर जोवर आतून तुम्हाला भ्रष्टाचाराबद्दल काही वाटत नाही आणि प्रत्येक जण स्वतः जेव्हा ह्यासाठी कटिबद्ध होईल तेव्हाच त्याची पाळेमुळे इथून उघडता येतील अन्यथा जण लोकपाल वैगेरे जेवढ वाटतेय तेवढ काही करू शकनार नाहीये... त्या आयोगातले लोकही भ्रष्टाचारी होणार नाहीत कशावरून...

sumedha said...

लोकांना स्वत:बद्दलच किती अविश्वास आहे याचे ही सर्व विधाने द्योतक आहेत . असे आंदोलन यशस्वी होऊ शकते ,असे काही परिवर्तन होऊ शकते , हेच लोकांना अविश्वसनीय वाटते . कारण हे बोलणारा कुठेतरी स्वत:बद्दलच साशंक आहे ,विद्यमान परिस्थितीबद्दल साशंक आहे . आंदोलनाबद्दल शंका व्यक्त केली की त्यात सामील होण्याचे धारिष्ट्य ही दाखवावे लागत नाही हा ही एक भाग आहे . आणि सामील झालोच समजा आणि ते आंदोलन यशस्वी नाहीच झाले तर तेही स्वीकारणे अवघड जाते हाही दुसरा मुद्दा आहे . मग त्यापेक्षा आंदोलनाबद्दल शंका उपस्थित करणे सोपे काम असते , ते बरेच जण सहजतेने करतात .
माझा अण्णांच्या आंदोलनाला संपूर्ण पाठींबा आहे . हा पाठींबा व्यक्त करण्यासाठी आम्ही मालवणवासीयांनी २२ ऑगस्ट पासून सुरु केलेल्या धरणे आंदोलनामध्ये मी सहभागी झाले आहे .

seeya said...

superlike.. ekdum patla..

onkardanke said...

'इंटरनेट इंटलेक्च्युअल्स' हा शब्द तूफान आवडला. आजकाल सध्या सर्वत्र त्यांचाच सूकाळ झालाय..ब्लॉगही खूप जबरदस्त झालाय. ह्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांची पाचावर धारण बसलेली बघून मलाही आनंद होतोय. मात्र तरीही अण्णांच्या आंदोलनाला माझा 100 टक्के पाठिंबा नाहीय. या मागची कारणे कांचन आणि देवेंद्र यांनी लिहलेत. त्यामुळे ती रिपीट करण्याचे टाळतोय इतकचं...

marathepa said...

http://iforeye.blogspot.com/2011/08/blog-post_1234.html Is what I think.

BTW Rahul Gandhi kon ahet kharokhar? Dnt you think ki marg chuktoi?

anup1090 said...

Mast kihikey post....... konitari BHRASHTACHARA virudh ubh rahatay... sarakarla kondit pakadtay aani sarkar sudha nak ghasat charchela tayar hotay yatach ANNANACHA nimma vijay aahe..... tasech konihi sarkarla namavu shakate hi dharanacha mulat chukichi aahe... jya manasamage tamam janata ubhi aahe tyalach he shakya aahe etrana naahi.....

Maithili said...

पूर्णपणे सहमत...
काहीही असले तरी...
राहुल गांधीच्या गोर्या गोमट्या चेहरयला भुलून त्याला icon मानणाऱ्या "youth" पेक्षा अण्णांना support करणारे youth
बघणे नक्कीच सुखावह आहे...

(सुषमेय) प्रवीण कुलकर्णी said...

sunder heramb.... masta mandalay.... pan yababtit mazi ji mate aahet ti mi purvich blogavar mandalit...

हेरंब said...

सुहास, काही महिन्यांपूर्वी राजू परुळेकरही मिडियाला नावं ठेवण्याऐवजी सचिनला नावं ठेवत होता. त्यावेळी म्हटलं तेच म्हणतो. स्टंटबाजी मिडिया करत असेल तर त्यासाठी अण्णांना दोष देण्यात अर्थ नाही. तुझा अण्णांना पाठींबा आहे याची मला कल्पना आहेच.

हेरंब said...

धन्यवाद शंतनू.. अरे ती अरुंधती बया आणि रोज ET/TOI मधे कोण कोण तथाकथित विद्वान अण्णांच्या आंदोलनाच्या विरुद्ध लिहितायत रोजच्या रोज. ते पाहून वैताग आला आणि सगळी भडास एकदम काढली !

हेरंब said...

अनघा, एकदम सहमत आहे. थोडक्यात आंदोलनाचे फायदे अनेक फायदे आहेत. काही दृश्य स्वरुपात तर काही दृष्टीआड.. :)

हेरंब said...

धीरज, अनेक लोकांचं असं मत आहे की अण्णा किंवा त्यांचे सहकारी भ्रष्ट, हट्टी वगैरे आहेत. त्याचं समर्थन करणारे अनेक व्हिडिओज, वेबलिंक्स, आर्टिकल्सही आहेत. ते कदाचित खोटं असेल किंवा काही प्रमाणात खरंही असेल. जे काय असेल ते असो, सरकारला स्वतःच्या मनमानी कारभाराला चाप लावायची वेळ आली हीच माझ्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. त्यासाठीच सुभाषबाबूंचं वाक्य आवर्जून दिलं.

हेरंब said...

सुपर धन्यवाद गौरी..

>> करू देत ना मिडियाने आंदोलनाला मोठं ... मी तर म्हणीन की कधी नाही ते आपले मिडियावाले त्यांचं काम नेकीने करताहेत. उगाच गणपती दूध पीत असल्याची ब्रेकिंग न्यूज दाखवण्यापेक्षा हे कितीतरी पटींनी बरं.

कसलं मनातलं बोललीस तू. अॅक्च्युअली हा मुद्दाही लिहायचा होताच. राहून गेला..

हेरंब said...

हो ना गौरव. भलेही वरचे काही किंवा सगळे मुद्दे खरे असतील पण तरीही सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळून एवढा विशाल जणसमुदाय कोणत्याही एखाद्या लोकप्रिय राजकीय नेत्याच्या हाकेशिवाय एकत्र जमलाय हीच फार सुखद बाब आहे !!

हेरंब said...

धन्यवाद आनंदा :)

हेरंब said...

आभार विशालभौ..

हेरंब said...

श्रीताई, तेच तर.. वरच्या मुद्द्यातही तथ्य असेल/आहे पण त्यामुळे का होईना लोक एकत्र आले आणि हे महत्वाचे. आणि त्यायोगे पुढच्या घोटाळ्यातले १०-१५ कोटी वाचले तर ती एका दृष्टीने राष्ट्रीय संपत्तीची बचतच आहे. नाही का?

हेरंब said...

सिद्धार्थ, खरंच. इतकी वर्षं असंख्य घोटाळे करूनही छाती पुढे काढून चालणाऱ्या बगळ्यांच्या माना आता खाली गेलेल्या बघून खरंच असुरी आनंद होतोय !

हेरंब said...

मान्यवर, भारतासारख्या देशाला म्युटमोहन सिंगसारखा पंतप्रधान मिळावा यासारखं दुसरं दुर्दैव नाही !

हेरंब said...

जीवनिका, प्रतिक्रियेबद्दल आभार.

>> शिवाय आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जगात इतरत्र हिंसक आंदोलने होत असताना या देशातील तरुण पिढी अहिंसात्मक पद्धतीने सरकारचा विरोध करते आहे. नाहीतर इतर वेळी सरकारला विरोध म्हणजे सरकी मालमत्तेची जाळपोळ हेच समीकरण होत.

हो ना. ही फारच महत्वाची गोष्ट आहे !

हेरंब said...

कांचन, तुझं मत वाचलं आणि पटलंही. पण हा एका विशिष्ठ पक्षाच्या सरकारला विरोध करायचा असा प्रकार नाहीये.. म्हणजे निदान माझा तरी. जर दुसऱ्या एखाद्या पक्षाचं सरकार असतं आणि त्यांनीही केवळ ४-५ वर्षात हजारो करोडो रुपयांचे गफले केले असते आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी असाच एखादा कुठल्याही जाती-धर्म-पंथाचा-वयाचा स्त्री-पुरुष उभा राहिला असता तरी माझ्या मतात काडीमात्र फरक पडला नसता. मी त्या व्यक्तीलाही तितक्याच हिरीरीने पाठींबा दिला असता.

>> आणि सामान्य माणसाला मुळात अण्णा लागतातच का?

अण्णा असं नाही पण कोणीतरी लागतंच लागतं. आणि हे शाश्वत सत्य आहे. कुठल्याही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात/ क्रांतीत अशी एखादी व्यक्ती असतेच. त्यामुळे अण्णा म्हणजे एक निमित्तमात्र आहेत इतकंच. !

हेरंब said...

हर्शल, सहमत.. आणि विरोध करणाऱ्यांच्या म्हणण्यात थोडंसं तथ्य असलं तरी सध्या तरी लोक एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतायत हेच सगळ्यात महत्वाचं आहे. जर लोक रस्त्यावर उतरले नसते तरीही नावं ठेवणाऱ्यांनी लोकांना अन्याय/भ्रष्टाचार सहन करण्याची सवय झालीये, कोणीच प्रतिकार करत नाही अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया दिला असत्या..

हेरंब said...

धन्यवाद बायनरी बंड्या. तेच.. काहीही झालं तरी आपला पाठींबा आहेच !! :)

हेरंब said...

धन्यवद लीना.. आणि सहमत.. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ कित्येक वर्षात दिसला नव्हता !

हेरंब said...

Savita tai, Completely agree. And even if IAC keeps that responsibility on our shoulder, ultimately it's us who are going (or not going) to accept/do it. So basically common man should start working towards this goal.

हेरंब said...

>> कारण सर्वसामान्यांना जन लोकपालाच्या जोरावर ज्या भारताची अण्णा समर्थक स्वप्न दाखवत आहेत,तो असा जादूची कांडी फिरवल्यासारखा पटकन होणार नाहीये.शिवाय अण्णा टीमचा नक्की हेतू काय आहे हे ही आता सांगता येत नाही कारणं हे आंदोलन एकटे अण्णा चालवत नाहीत खूप हुशार डोकी ह्यामागे कार्यरत आहेत ,त्यांचा उद्देश काही वेगळा तर नाही ना

देवेन, अरे निदान ती स्वप्नं बघण्यासाठी तरी लोक एकत्र येतायत, रस्त्यावर उतरतायत हे खूप आहे रे. घोटाळे बाहेर पडतात तेव्हा सरकारच्या नावाने नाकं मुरडण्यापेक्षा हे नक्कीच बरं ना.. (हे जनरल स्टेटमेंट आहे. तुला उद्देशून वगैरे मुळीच नाही. गैस नसावा.)

>> जनलोकपाल वैगेरे जेवढ वाटतेय तेवढ काही करू शकनार नाहीये

सहमत. कदाचित काहीच करू शकणार नाही. पण सरकारच्या मनात भ्रष्टाचाराची भीती तरी बसेल !! ते झालं तरी खूप आहे.

>> त्या आयोगातले लोकही भ्रष्टाचारी होणार नाहीत कशावरून

याचीही काही खात्री नाहीच. पण तसं घडलं तर जनता अर्थात आपण सगळे पुन्हा त्या व्यक्तीला धडा शिकवूच !

हेरंब said...

सुमेधा, छान प्रतिक्रिया.. आवडली. आणि आंदोलनात सक्रीय सहभागी आहेस हे वाचून प्रचंड आनंद झाला. मनःपूर्वक अभिनंदन !!!

हेरंब said...

अनेक धन्यवाद सिया :)

हेरंब said...

हाहा.. धन्यवाद ओंकार. तो शब्द त्या देशद्रोही रॉय बयेला उद्देशून होता प्रामुख्याने. आणि मटामधले प्रताप आसबे, किंवा TOI/ET मधले असेच कोण कोण स्वघोषित विद्वान !!

असो.

>> या मागची कारणे कांचन आणि देवेंद्र यांनी लिहलेत.

देवेन आणि कांचन यांना दिलेल्या उत्तरावरून माझी बाजू काय आहे हे कळायला मदत होईल अशी आशा आहे.

हेरंब said...

प्रियदर्शन, प्रतिक्रियेबद्दल आभार. सहमत. राहुल गांधी कोणीच नाहीयेत हे मान्य. ही किंवा इतर अनेक चुका असतीलही. पण त्यावरून मार्ग चुकलाय असं म्हणणं मला तरी पटत नाही. रटाळ वाटेल पण पुनःपुन्हा माझा मुद्दा एकच आहे. यानिमित्ताने का होईना हजारो,लाखो लोक भ्रष्टाचाराचा विरोध करायला एकत्र आले हीच मोठी गोष्ट आहे !

हेरंब said...

प्रतिक्रियेबद्दल आभार अनुप. हो. जनता एकत्र होऊन लढतेय हाच या आंदोलनाचा सर्वात मोठा फायदा !

हेरंब said...

सहमत मैथिली.. वेल सेड..!

हेरंब said...

धन्यवाद प्रवीण.. हो मी तुझा तो लेख वाचला आहे आणि मला तो आवडलाही होता..

Mahesh said...

very good. Mala dekhil asech vatatay.

हेरंब said...

धन्यवाद महेश ! ब्लॉगवर स्वागत.

sahajach said...

संपुर्ण पोस्ट +१ .... हेरंबा अनेकांच्या मनातल लिहिलं आहेस.....

Sagar Kokne said...

'प्रसंगी सैतानाची मदत घ्यावी लागली तरी ती मी घेईन'...अरे पण हा भ्रष्टाचार इतका बोकाळलाय की सैतानानेही आपला काही फायदा असल्याशिवाय मदत केली नसती. म्हणजे भ्रष्टाचार संपवण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचार!
पण अण्णा असे काही करतील असे वाटत नाही, जनलोकपाल मान्य तर झाले यापुढची लढाई फार सामंजस्याने सगळ्यांनीच लढने फार आवश्यक आहे.

हेरंब said...

धन्यवाद तन्वे... प्रतिक्रियेबद्दल आभार..

हेरंब said...

सागर, अण्णा असं काही करतील असं नक्कीच वाटत नाही. ७७ व्या वर्षी पेन्शन घेऊन शांतपणे जगायचं सोडून उपोषणं करत बसणारा माणूस हा नक्कीच वेगळा आहे त्याशिवाय हे शक्य नाही !

satyashodhak.com said...

परकीय इंग्रजांविरुद्ध असे बोलणे आणि लोकनियुक्त प्रतिनिधींवर असे बोलणे यात फार मोठा फरक आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, काही लोकप्रतिनिधी भ्रष्ट आहेत याबद्दल दुमत नाही. पण यामुळे पूर्ण संसदीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवणे भारतासारख्या देशाला परवडणारे नाही.

वर म्हटल्याप्रमाणे अण्णांचा हेतू चांगला असेलही पण त्यांचा वापर स्वतःच्या एन.जी.ओ. वाढवण्यासाठी काही जणांनी केला हे त्रिवार सत्य आहे. अण्णांनी नंतर आपली चूक सुधारली हेही मान्य करावे लागेल. भ्रष्ट लोक सगळ्याच पक्षात आहेत, कोणीच याला अपवाद नाही.

केवळ कायदे करून हा प्रश्न सुटणार नाही. भ्रष्टाचार होण्याला जेवढे नेते जबाबदार आहेत तेवढेच मतदार हि आहेत. मतदारांनी जर नेत्यांना निवडणुकीला मत मागायला आल्यावर जाब विचारला तर त्यांची हिम्मत होणार नाही भ्रष्टाचार करण्याची. या गोष्टी कमी होण्यासाठी आधी जनतेचे "मोरल पोलीशिंग" करणे गरजेचे आहे.

अपर्णा said...

इतक्या उशीरा "या" पोस्टवर कमेंट देणारी मी एकटीच असेन...लेख पटला आणि हो हे वाचलस का?? तुझं फ्यान फोल्लोविंग जास्त आहे म्हणून मुद्दाम इथे देतेय...सगळ्यांनी वाचयला हव....

http://www.loksatta.com/lokprabha/20110909/tathya.htm

हेरंब said...

धन्यवाद अपर्णा.. प्रतिक्रियेबद्दलही आणि या लिंकबद्दलही !

कल्पेश मोहिते said...

मस्तच हेरंब,


वेळ मिळाला नाही म्हणून आज वाचले. आणि प्रतिक्रिया सुद्धा देत आहे. अण्णा या एका व्यक्ती मुळे जेव्हा आपला सगळा मुलुख एकत्र होतो हि गर्वाची बाब माझ्यासाठी तरी आहे. आणि राजकीय पक्षांच्या तोंडात घालण्यासाठी हे शेण आहे असे व्यक्तीगत मत आहे. आणि हो खरच "माझा अण्णांना संपूर्ण पाठींबा आहे. कारण त्यानिमित्ताने का होईना सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, कुठल्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय एकत्र आला"


साला पुढचा भ्रष्टाचार करताना, घोटाळे करताना, ते निर्लज्जपणे दाबून टाकताना, कोणाच्या बापाची भीती नसल्यागत बेलगामपणे हिंडणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या डुकरांना क्षणभर जरी अण्णांची, या आंदोलनाची, विशाल जनसमुदायाची आठवण झाली आणि त्या दहशतीने पुढच्या घोटाळ्यांची साईज पाच टक्क्यांनी जरी कमी झाली तरी माझ्या दृष्टीने ते प्रचंड मोठं यश आहे. आणि त्यासाठी सुभाषबाबू म्हणतात त्याप्रमाणे सैतानाची, राक्षसाची मदत घ्यावी लागली तरी माझी हरकत नाही. माझा त्यांना पाठींबाच असेल ! अगदी सुपर लाइक.....

हेरंब said...

मनःपूर्वक धन्यवाद, कल्पेश.

विजय देशमुख said...

No post after 23 August ? Is everything ok ?

हेरंब said...

Hey Vijay, Thanks. Yes everything is ok..

This state is a combo of too much of stuff at workplace, covering few movies/series from a long waiting list and sheer laziness !! ;)

I'll write something pretty soon. Thanks for asking (and caring :) )

विजय देशमुख said...

how about giving that list of movies here ? Just a thought

हेरंब said...

विजय, सध्या चित्रपटांपेक्षा सिरीज बघणं चालू आहे.

प्रिझन ब्रेक, डेक्स्टर, द बिग बँग थिअरी (भन्नाट विनोदी) आणि एन्शन्ट एलियन्स या सिरीज बघितल्यात/बघतोय. या सगळ्या मी नक्की रेकमेंड करेन.