Thursday, November 24, 2011

जा..ळ.. !!!


काही काही शब्द बघता बघता एकमेकांचे असे काही प्राणसखे बनतात किंवा बेजावदार माध्यमं आणि अक्कलशून्य नेतेमंडळी त्यांना इतक्या कुशलतेने एकमेकांत गुंफतात की आपल्याला पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दावाचून विचारही करवत नाही. वरच्या वाक्यातला 'बेजावदार माध्यमं/मिडिया' किंवा 'अक्कलशून्य नेतेमंडळी' हे शब्द ही त्यांचीच उदाहरणं होऊ शकतात म्हणा. पण अर्थात योग्य उदाहरणं. असो.... तर चितळ्यांची बाकरवडी, अमूल बटर किंवा मग नेस्लेची कॅडबरी, कॅननची झेरॉक्स वगैरे वगैरे वगैरे ही काही उदाहरणं. तर या दोन जमातींच्या मते अक्कलशून्य नेतेमंडळींना (यापुढे हे दोन शब्द एकत्रित येतील हे अध्याहृत आहे. अनलेस स्पेसिफाईड अदरवाईज !) जनतेद्वारे दिली जाणारी ट्रीटमेंट, त्यांच्याबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया या त्यांच्याविरुद्ध जनतेच्या मनात खदखदत असलेला क्षोभ, असंतोष, कमालीचा संताप, तीव्रतम द्वेष याचा एकत्रित परिपाक असूच शकत नाही. असतो तो फक्त 'भ्याड हल्ला'

भ्याड??????? हल्ला???????

जनहितार्थ (वाचा मिडिया आणि नेतेमंडळी हितार्थ) काही शब्दार्थ-

भ्याड : पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा/री

हल्ला : आक्रमण, जोरदार धडक किंवा शुद्ध बोलीभाषेत हमला/अटॅक किंवा मग धक्काबुक्की करून जोरदार मारझोड

मला शाळेत शिकवलेल्या मराठीनुसार आणि माझ्या वकुबानुसार मी अर्थ दिले आहेत आणि ते बहुधा चुकीचे नसावेत असा माझा कयास आहे !



आता हे शब्द आपण हरविंदर सिंगने शरदरावांच्या श्रीमुखात भडकावून दिल्याच्या घटनेशी जोडून पाहू. तर हरविंदर सिंग पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा आहे का? निश्चितच नाही. तो भित्रा इसम असता तर सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरणाऱ्या शरच्चन्द्रांच्या चंद्र्मुखात (आणि दुखरामाच्याही.. नॉट टू फरगेट) एक सणसणीत चपराक भडकावण्यासारखं कृत्य त्याने केलंच नसतं. शिव्या देणारी पत्रं पाठवली असती, अनामिक इ-मेल आयडीवरून इमेल केले असते, पवारांच्या घरावर रात्रीच्या अंधारात गुपचूप दगडफेक करून पळ काढला असता. त्याने असं काही केलं का? कृती करून तो तोंड लपवून बसला का किंवा अंधारात दडला का? मुळीच नाही. उलट त्याने त्याच्या कृत्याची कारणमिमांसाही दिली. "चोर है सब साले चोर है. सब मालूम है इन्हे (शरदरावांच्या "मुझे कुछ मालूम नही"" या उत्तरला उद्देशून)" असंही सांगितलं. असो. ही व्यक्ती भ्याड नाही हे मान्य करायला एवढे पुरावे पुरेसे असावेत माझ्या मते.

आता हल्ला... हल्ला????? अरे हल्ला एक देश दुसऱ्या देशावर करतो, एक टोळी दुसऱ्या टोळीवर करते, एक समूह दुसऱ्या समूहावर करतो, किंवा मग एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोरदार धक्काबुक्की करून तीव्र जखमी करण्याच्या उद्देशाने करते तो हल्ला असतो.

तर या ठिकाणी असं झालं का? माझ्या मते नाही. उसळत्या आणि सतत चढत्या महागाईने व्याकुळ आणि संत्रस्त झालेल्या जनतेच्या असंतोषाला हरविंदररूपी एका सामान्य माणसाने करून दिलेली वाट, सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरुद्ध व्यक्त केलेली प्रतिक्रिया.. कडकडीत प्रतिक्रिया म्हणू हवं तर. हल्ला नक्कीच नाही. एक विसरू नका की हरविंदरकडे एक छोटा चाकूही होता आणि त्याच चाकूने त्याने स्वतःच्या मनगटावर वारही करून घेतले. हल्लाच करायचा असता तर त्या चाकूएवढं दुसरं कुठलंही योग्य हत्यार त्याच्याकडे त्यावेळी नसावं. हल्लाच करायचा असता तर चाकूने केला असता, जखमी केलं असतं. पण त्याने तसं केलं नाही. कारण हल्ला करणे हा हेतू नव्हताच तर फक्त आणि फक्त असंतोषाला वाट करून देणं एवढाच हेतू होता; रोजच्यारोज हातातोंडाची मिळवणी करताना जनतेवर कोसळणाऱ्या महागाईरूपी संकटाचा आणि बसणाऱ्या झळांचा आणि त्याला कारणीभूत असलेल्या सरकारचा एक प्रतिकात्मक निषेध !!

थोडक्यात हरविंदरने जे केलं तो भ्याड हल्ला नव्हता. भ्याड हल्ला हा असा नसतो. कधीच नसतो.. नसतोच. हा होता तो जा..ळ.. कडकडीत, सणसणीत जाळ!!

मुंबईवर २६/११ ला कसाब आणि त्याच्या भावडांनी केला तो भ्याड हल्ला होता किंवा मग कारगीलवर पाकिस्तानेने केला तो. हरविंदरने जे केलं तो भ्याड हल्ला नक्कीच नाही. तत्कारणात निदान यापुढे तरी प्रसारमाध्यमं आणि नेतेलोक्स यांनी 'भ्याड' आणि 'हल्ला' हे दोन हल्ले एकत्रितपणे वापरण्याची खाज, अर्ज (इंग्रजीतला) रोखून ठेवावी !!

आणि हो.. जाता जाता अजून एक.. हरविंदरची कृती चूक की बरोबर किंवा मिडियाच्या भाषेत "हल्ला झाला" हे चूक की बरोबर असल्या थोतांड विषयात मला पडायचंच नाही. कारण झालं ते अगदी योग्यच झालं. आणि अशा हल्ल्याला पाठींबा देणं हे विकृत, पिसाट आणि भ्याडपणाचं लक्षण असेल तर मी कमालीचा विकृत आणि पिसाट आहे आणि हे असे तथाकथित भ्याड हल्ले वारंवार होवोत आणि या हल्ल्याचं आणि भविष्यात कुठल्याही राजकीय व्यक्तीवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचं मी जाणीवपूर्वक आणि साभिमान समर्थन करतो !!

ता. क. : नेते लोकांना होणारी मारहाण, चपला/बुट फेकणे या संबंधी बोलताना हे असलं करण्यापेक्षा "निवडणुकांच्या वेळी  मतदान करा आणि योग्य व्यक्तीला निवडून द्या" असं सांगणं हे माझ्यामते फारच हास्यास्पद आहे. अशा गोष्टींवर निवडणूका आणि मतदान हे अत्यंत फसवे पर्याय आहेत, अतिशय ढोंगी उपाय आहेत. कारण आपण निवडून दिलेली व्यक्ती सत्तेत आल्याआल्याच भ्रष्टाचार किंवा जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू लागली तरीही ती व्यक्ती पुढची पाच वर्षं आपल्या गळ्यात लोढणं म्हणून अडकून राहतेच आणि करायचा तो भ्रष्टाचार करतेच किंवा जनतेच्या  प्रश्नांकडे दुर्लक्ष करतेच. माकडउड्या मारता मारता लोकसभेत जाऊन पोचलेल्या गोंद्याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. त्यामुळे यावर उपाय म्हणून तेवढी ती मतदानाची उदाहरणं वगैरे प्लीज देऊ नका.

79 प्रतिक्रिया:

सुहास said...

_/\_ _/\_ _/\_


तुझ्या ह्या शब्दांचा नेहमीच ऋणी राहीन... अगदी मनातला जा...ळ... !!

आनंद पत्रे said...

प्रचंड जळजळीत लेख!!!

दीपक परुळेकर said...

प्रचंड जळजळीत लेख!!
हिंदुस्थानी मिडीया ही अक्क्लशून्य आहे ती या नेतेलोक्स मुळेच!
हम नहीं सुधरेंगे हेच त्यांचे ध्येय्य्वाक्य आहे!

rohit said...

सणसणीत...!!!!
अँटलिस्ट तू हे लिहीलस तरी..इथे तर लोक हातात झेंडे घेऊन दुकान बंद करत फिरतायत...जस काही यांच्या घरी महागाईच नाही..किंवा यांचे सन्माननीय (?)नेते यांच्या घरी दोनपाच गोणी आणून टाकतात..!!
सामाजिक आणि राजकिय अपरीपक्वतेच उत्तम ऊदाहरण...!!!!

Shruti said...

...खरेतर हे खूप आधीच व्हायला हवे होते... नाही का?
सामान्य नागरिक हल्ल्यामध्ये मरतात तेव्हा चालतं मग एक-दोन नेत्यांवर जनतेने रोष काढला तर त्यात काय बिघडलं?

लेख खरेच जळजळीत आहे..

Anonymous said...

अप्रतिम!!
तू हे सर्व इथे मांडल्या बद्दल अनेक धन्यवाद!! अगदी मनातलं लिहिलं आहेस...
आजकाल TV वर ती नवीन advertise येतेय न, "देश उबल रहा है" त्याचा हे एक उत्तम उदाहरण आहे...
अण्णा हजारे यांनी दिलेली प्रतिक्रिया प्रत्येकाच्याच मनात होती..
Nice post ..
Regards ,
Priti

Amol Deshpande said...

मस्त रे...लेख आवडला
Will start following your blog

Yogesh said...

सत्यवाना...शि.सा.दंडवत...

प्रचंड जळजळीत लेख :) :)

Anonymous said...

zakaas!!

सिद्धार्थ said...

तथाकथित "हल्ल्या"ची योग्य कारणमीमांसा.
ह्या राजकारणी लोकांवर अश्या हल्ल्यांची इतकी जरब बसली पाहिजे की साले शौच्यालयात देखील एकटे न जाता चार-पाच अंगरक्षक बरोबर घेऊन गेले पाहिजेत. गद्दाफिने जे शेवटचे काही तास भोगले ते ह्या साल्यांना रोज भोगायला लागले पाहिजे.

Unique Poet ! said...

भ्याड : पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा/री

हल्ला : आक्रमण, जोरदार धडक किंवा शुद्ध बोलीभाषेत हमला/अटॅक किंवा मग धक्काबुक्की करून जोरदार मारझोड

हे एकदम सहीये !

ता. क. : परफेक्ट

मनातील जाळ काढणारी पोस्ट ! जे तु मांडले आहेस ते अगदी अगदी मनातील आहे ...! जियो..!

प्रतिक ठाकूर said...

'बेजावदार माध्यमं/मिडिया' किंवा 'अक्कलशून्य नेतेमंडळी'
दोन्ही ठिकाणी द्विरुक्ती झाली आहे. ;)

बाकी जाळ एकदम कडक.

onkardanke said...

अगदी जळजळीत लेख आहे. थेट भिडणारी भाषा आहे यात वाद नाही.
देशातील बहुतेक नेते भ्रष्ट आहेत तसेच मीडियाची भाषा काही वेळा अतिरंजीत होते हे देखील मान्य. पण म्हणून हरविंदर सिंगचा मार्ग काही बरोबर नाही.
वाढती महागाई, रुपयाचे अवमुल्यन यामुळे देशाचा भावी काळ खडतर असणार आहे. चिली किंवा ग्रीसमध्ये जे झाले ते आपल्याकडेही होऊ शकते. अशा वेळी गरज आहे ते कठोर उपायांची अमंलबजावणी करण्याची. हरविंदर सिंग सारख्या व्यक्तीचे मार्ग हे केवळ अराजकतेला निमंत्रण देणारे आहेत.

sahajach said...

हेरंबा सणसणीत..... जा....ळ, आ...ग शब्दाशब्दातून व्यक्त होतेय..... खरय तुझं जोरदार पाठिंबा, समर्थन दिलेच पाहिजे अश्या हिंमतवानांना... निदान करोडो षंढांपेक्षा पुरूषार्थ गाजवणारा एखादा कधीही श्रेष्ठ ठरतो!!!

बाकि मिडिया आणि अक्कल वगैरे गोष्टींचा परस्परसंबंध नाही असेच माझे मत आहे.... विकले गेलेली प्रजा सारी!!!

Vikrant Deshmukh... said...

मान्यवर,
एकदम मनातले बोल्लात !!!!!
’भ्याड’ या शब्दाची व्याख्याच बदलून टाकली या लोकांनी...
आणि आपले दुर्दैव म्हणजे इकडे एक सरदार कानाखाली मारतो, दुसरा येऊन त्याची विचारपूस करतो तर तिसरा महापौरासारख्या प्रतिष्ठेच्या पदाची जाण न ठेवता ’पुणे’ बंदची हाक देतो... काय करावे आता?

नागेश देशपांडे said...

+ 1

अनामिका!! said...

खरच जिगर दाखवली आहे हरमिंदरसिंगने ज्याने पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याचे पवित्र कार्य केलेय त्याने...'किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला"... अशीच श्रीमुखात ज्यांच्या ज्यांच्या लगावावी असे वाट्ते अश्या नतद्रष्टांची यादी बरिच मोठी आहे...
आज एका सच्च्या सरदाराने पवारांच्या श्रीमुखात भडकवून त्यांचा यथोचित सत्कार केलाय...
आनंद व्यक्त करायला भावना शब्द सगळच अपुर आहे...राहुल गांधीच्या सभेला काळे झेंडे दाखवणाऱ्या समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेस च्या मंत्र्यांनी लाथा बुक्क्याने मारले..... मग एखाद्या मंत्र्याला सामान्य माणसाने कानाखाली वाजवली तर काय वावग केल?

सत्यशोधक said...

महाराष्ट्राचे एक जबाबदार नेते आणि भारताचे कृषिमंत्री (जे फक्त एक सुरक्षारक्षक घेऊन फिरतात!) यांच्यावर झालेला हल्ला लोकशाहीच्या दृष्टीने निषेधार्हच आहे. आणि तो कुणावरही झाला तरी त्याचे समर्थन करता येणार नाही.

पण सर्वांनी खुश होण्याआधी थोडा तटस्थ विचार करावा, कारण नॉन इशू ला इशू करण्यात भारतीय मीडियाचा हात कुणीच धरणार नाही. हा हल्ला आताच का झाला? शरद पवारांवरच का झाला? याचा विचार होणे आवश्यक.

सध्या महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुका आहेत आणि सत्ताधारी सगळे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले आहेत, अश्यावेळी राष्ट्रवादीला मिळालेली शक्ती दाखवण्याची हि संधी आहे असे माझे मत आहे. आणि त्यांनी ते दाखवूनही दिले आहे.

मुळात ह्या हरविंदर सिंगने दोन-तीन दिवसापूर्वीच एका काँग्रेसी मंत्र्यावर हल्ला केला होता मग त्याला पोलिसांनी सोडले कसे? आणि तो प्रधानमंत्री मनमोहन सिंगाच्या ऐवजी पवारांकडे का आला?

आणि ह्या हल्ल्यानंतर शरद पवारांना देशभरात प्रचंड सहानुभूती मिळाली आहे, आणि ह्याचा थेट फायदा त्यांना निवडणुकीत होणार आहे.

आणि आपला ता.क. थोडा हास्यास्पद आहे. तुम्ही म्हणता नेता पाच वर्ष गळ्यात अडकतो, मग पवार वर्षानुवर्षे कसे निवडून येतात? आणि फक्त पवारच नाही तर सगळे नेते जवळपास दोन-तीन टर्म पूर्ण केलेले आहेत. मग हा मुद्दा गैरलागू कसा? त्यांना दुसऱ्या वेळीच जर आसमान दाखवले तर पुन्हा ते कसा भ्रष्टाचार करतील?

आणि तुमच्या लिखाणातून हुकुमशाहीचे समर्थन दिसते, सगळे जग हुकुमशाहीला कंटाळल्याचे दिसत असताना निवडणुका व पर्यायाने लोकशाहीवर अविश्वास दाखवणे चूक आहे. याचा पुनर्विचार करा.

अपर्णा said...

हेरंब प्रचंड प्रचंड रे भावा....सॉलिड जाळ काढलायस...

Mahendra Kulkarni said...

फेसबुकावर तर काही लोकं स्वतःच्या बापाच्या थोबाडीत मारल्यासारखे कॉमेंट्स टाकताहेत.
शरदाच्या चांदण्यांना ग्रहण लागलंय.. ते सुटणार नाही कधीच हे नक्की. तो अजीत येडा वाट्टेल ते बरळतोय. चक्क एखादा भाई असल्यासारखी त्याची देहबोली आहे,

Mahesh said...

अतिशय चांगला लेख. मी तुमचे बरेच लेख वाचले. तुम्ही अगदी निर्भीड पणे लिहिता.

Sagar Kokne said...

बुकलून काढायला पाहिजे साल्यांना...लोक पण कितीकाळ स्वत:चा फायदा होतो म्हणून त्यांची थुंकी झेलत राहतात...
नेत्यांकडून कामे होत नसतील तर अशाच प्रतिक्रिया मिळायला हव्यात...!

Ashwin said...

हेरम्ब,

आज ब-याच दिवसांनी तुझा ब्लॉग वाचला.
आपल्या लोकशाहीची एक शोकांतिका म्हणजे निवडणुकांमध्ये चांगला आणि वाईट याऐवजी आपल्याला वाईट आणि कमी वाईट (किंवा चोर आणि कमी चोर) यांच्यात निवड करावी लागते. दुसरी शोकांतिका म्हणजे अत्यंत बेजबाबदार नेते, भरकटलेले राजकीय पक्ष आणि त्यांचे अंध समर्थक (किंवा गुंड-दोन्हीही एकच!). यांना नीति-अनीतिची चाड नाही, आपल्या पदाची आणि त्याच्या जबाबदारीची जाण नाही. हे खरं तर जनतेचे नोकर आहेत, पण यांना त्याचीही जाणीव नाही.
अधून-मधून यांची श्रीमुखं अशी रंगली तर निदान यांना जाग तरी येवो आणि "मलाच हा प्रसाद का?" हा प्रश्न स्वत:ला विचारावासा वाटो हीच प्रार्थना आहे!

हेरंब said...

आभार आभार सुहास !

हेरंब said...

धन्यवाद आनंदा.. सगळा संताप बाहेर आला.

हेरंब said...

दीपक, खरं आहे. काहीही बडबडत असतात हे लोक!!

हेरंब said...

धन्यवाद रोहित.. सगळा मुर्खपणा आहे च्यायला. शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या विसरलेत सगळेजण !! :(

हेरंब said...

धन्यवाद श्रुती. खरंय.. हजारो निष्पाप शेतकऱ्यांना याच्या निष्क्रीयतेमुळे आत्महत्या करायला लागल्या. त्यामुळे थोडासा रोष निघाला तर काहीही बिघडत नाही !!

हेरंब said...

धन्यवाद प्रीती. सगळ्यांच्याच मनात आहे हे. उघडपणे व्यक्त करणं चूक की बरोबर अशा द्वंद्वात लोकं मिडियाचं ऐकून निषेध करून मोकळे होतात !

हेरंब said...

धन्यवाद अमोल. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

हेरंब said...

आभार योगेशराव :)

हेरंब said...

आभार अनामिक.

हेरंब said...

सिद्धार्थ, अगदी अगदी.. गद्दाफीपेक्षाही हालहाल झाले पाहिजेत साल्यांचे !

हेरंब said...

धन्यवाद समीर. अनेकांच्या मनात हे होतंच. अधिकतर लोकांना या घटनेने आनंदच झालेला आहे !!

हेरंब said...

हाहाहाहा प्रतिक.. खरंय..

प्रतिक्रियेबद्दल आभार !

हेरंब said...

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, ओंकार..

>> अशा वेळी गरज आहे ते कठोर उपायांची अमंलबजावणी करण्याची.

पण मग ते कोणी करणं अपेक्षित आहे? आणि कोण करत नाहीयेत? का करत नाहीयेत? हाच तर मुख्य मुद्दा आहे.

>> हरविंदर सिंग सारख्या व्यक्तीचे मार्ग हे केवळ अराजकतेला निमंत्रण देणारे आहेत.

सहमत. पण म्हंटलं तर अराजक म्हंटलं तर क्रांती !! भ्रष्ट नेत्यांना काळे धंदे करण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या मनात जबरदस्त दहशत बसली पाहिजे आणि त्यासाठी कुठलाही मार्ग चुकीचा नाही हे माझं स्पष्ट मत आहे. मागे एकदा सुभाषबाबूंचं वाक्य दिलं होतं त्यात दिल्याप्रमाणेच !

हेरंब said...

तन्वे, तेच तर.. अशा कृत्यांनी दहशत बसत असेल आणि भ्रष्टाचाराला एक अर्धा-पाव टक्का जरी निर्बंध बसत असेल तर असे प्रकार अधिकाधिक होणं यात काहीही चूक नाही !

>> मिडिया आणि अक्कल वगैरे गोष्टींचा परस्परसंबंध नाही असेच माझे मत आहे

अगदी अगदी !

हेरंब said...

धन्यवाद मान्यवर..

'पुणे' बंद ची घोषणा यासारखं दुसरं हास्यास्पद काही असू शकत नाही. अरे संप/बंद कोण करतं, कशासाठी करतं याचीच या लोकांना शुद्ध राहिलेली नाही. अरे गाढवांनो तुम्ही सत्तेत आहात तुम्हीच बंद कसले पुकारताय?? च्यायला अकलेचं दिवाळं नुसतं !

हेरंब said...

धन्यवाद नागेश !

हेरंब said...

खरंय अनामिका. असं सत्कृत्य ज्यांच्या ज्यांच्या थोबाडावर उमटावं अशा लायक उमेदवारांची यादी खरंच खूपच मोठ्ठी आहे.

धूर्त राजकारण्यांचे नियम सामान्यांना लागू हॉट नाहीत ना ... :((

हेरंब said...

सत्यशोधक,

"जबाबदार नेते आणि भारताचे कृषिमंत्री" !!

खरंच आहेतच ते जवाबदार..

- महाराष्ट्र आणि आंध्रातल्या हजारो निरपराध शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी
- स्टँपपेपर घोटाळ्यासाठी
- दाउदचा हस्तक बनून देशभर त्याचा धंदा पसरवण्यासाठी.

त्यांचं कृषीमंत्रीपद या हजारो आत्महत्यांमधून अगदी ठसठशीतपणे समोर आलंच म्हणा !

>> मुळात ह्या हरविंदर सिंगने दोन-तीन दिवसापूर्वीच एका काँग्रेसी मंत्र्यावर हल्ला केला होता मग त्याला पोलिसांनी सोडले कसे? आणि तो प्रधानमंत्री मनमोहन सिंगाच्या ऐवजी पवारांकडे का आला?

हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा पोलिसांना किंवा मनमोहनला का नाही विचारत? कारण पवार काय किंवा अन्य कुठलाही नेता काय यापैकी कोणावरही हल्ला झाला असता तरी मला एवढाच आनंद झाला असता आणि मी अशीच पोस्ट लिहिली असती.

>> आणि तुमच्या लिखाणातून हुकुमशाहीचे समर्थन दिसते,

मी हुकुमशाहीचं अजिबात समर्थन केलेलं नाही. अजितराव पवारांनी स्वतः गुंड असल्याचं कबुल करून गुंडगिरीला पर्याय नाही अशा अर्थाचं विधान काही महिन्यांपूर्वीच केलं होतं हे तुम्हाला स्मरत असेलच. त्या विधानाचा अर्थ तुम्ही कसा लावलात ते समजून घ्यायला आवडेल.

आणि अखेर एकच सांगतो "I'm only responsible for what I say and not for what you understand !!!!!!"

हेरंब said...

आभार अपर्णा. मनातला जाळ :)

हेरंब said...

>> फेसबुकावर तर काही लोकं स्वतःच्या बापाच्या थोबाडीत मारल्यासारखे कॉमेंट्स टाकताहेत.

हाहाहा काका.. लोळतोय !!

>> तो अजीत येडा वाट्टेल ते बरळतोय. चक्क एखादा भाई असल्यासारखी त्याची देहबोली आहे,

अगदी अगदी. तो आहेच भाई.. पण काहीजणांना ते पटत नाही !! पुढचा नंबर त्याचाच असणार बहुतेक. ;)

हेरंब said...

धन्यवाद महेश. लेखन आवडल्याचं आवर्जून कळवल्याबद्दल हार्दिक आभार. कोणाला काय वाटेल/वाटतंय हा विचार करण्यापेक्षा आपल्याला काय वाटतंय ते लिहिण्याचा प्रयत्न असतो माझा सहसा. पुन्हा एकवार आभार.

हेरंब said...

सागर, खरंच रे. थुंकीझेल्यांची काही कमतरता नाही आपल्या देशात !

>> नेत्यांकडून कामे होत नसतील तर अशाच प्रतिक्रिया मिळायला हव्यात...!

१००% सहमत !

हेरंब said...

अश्विन,

प्रतिक्रियेबद्दल आभार. बऱ्याच दिवसांनी आलास !

खरंय.. आणि त्या प्रत्येक पांढऱ्या बगळ्याला असा प्रसाद एकवेळ तरी मिळायला हवाच जेणेकरून माज उतरेल आणि जमिनीवर उतरून जरा तरी विचार करतील सामान्य माणसाचा !

Anonymous said...

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10913058.cms

Anonymous said...

very nice !

kharach kupach chabuk lihtos re !!!

keep it up!

हेरंब said...

धन्यवाद अनामिक.

आणि आसबेसाहेबांच्या लेखाविषयी. प्रताप आसबे हा शरद पवारने भाड्याने ठेवलेला माणूस आहे. तो शरद पवारसाठी पेड न्यूज लिहितो. त्याचं लेखन इतकं मनावर घेण्याची आवश्यकता नाही.

अनामिका!! said...

हरमिंदरसिंह याला माथेफिरु म्हणणे किंवा पवारांच्या श्रीमुखात भडकवण्याच्या धाडसीपणाला भ्याडपणा म्हणणे म्हणजे तद्दन भंपकपणा आहे.....या निगरगट्ट राजकिय नेत्यांना खरे तर आत्मपरिक्षणाची नितांत गरज आहे पण या नालायकांच्या शब्दकोशात आत्मपरिक्षण या शब्दाचीच वानवा आहे...जे जे हॉस्पिटल हत्याकांड ज्या दाऊदच्या लोकांनी घडवून आणले होते ते सगळे दाउदचे हस्तक पवार या देशाचे संरक्षणमंत्री असताना पवार स्वतः प्रवास करत असलेल्या इंडियन एयरफोर्सच्या विमानातून दिल्लीस पळून गेले होते . जे मारेकरी परत कधी सापडले नाहीत. ज्या संरक्षण्मंत्रीपदी आरुढ असलेल्या व्यक्तीला आपल्या खास विमानातून खतरनाक गुंड प्रवास करतात हे कळत नाही (किंवा न कळाल्याचे सोंग घेतले जाते)तो नेता एकतर मुर्ख, नालायक असला पाहिजे किवा देशद्रोही असला पाहिजे

satyashodhak.com said...

आपण उल्लेखित केलेल्या गोष्टींना शरद पवार जबाबदार आहेतच पण त्यापेक्षा जास्त इथली व्यवस्था जबाबदार आहे. लोकशाहीत होणाऱ्या हल्ल्यांचे आपल्यासारख्या सुज्ञांनी तरी समर्थन करू नये.

अजित पवारांच्याविषयी माझे वैयक्तिक मत अजिबात चांगले नाही. केवळ काकांच्या कर्तृत्वावर उभे असलेले ते नेते आहेत. आणि जे खमक्या वगैरे म्हणून त्यांचे चित्र रंगवले जाते ते अजूनपर्यंत त्यांनी सिद्ध केले नाही.

मावळ प्रकरण आपल्या लक्षात असेलच, तिथेच त्यांनी आपली बांधिलकी स्पष्ट केलेली आहे.

हेरंब said...

धन्यवाद अनामिका. नेते आणि आत्मपरीक्षण हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत. शरद पवार स्वतः दाउदचे हस्तक आहेत याबद्दल तर जराही शंका नाही !

हेरंब said...

सत्यशोधक,

>> आपण उल्लेखित केलेल्या गोष्टींना शरद पवार जबाबदार आहेतच

बास. झालं तर मग. निदान एका तरी शेतकऱ्याच्या आत्महत्येला शरद पवार जवाबदार आहेत हे जर तुम्हाला मान्य असेल तर मग एका थपडेमुळे एवढा आकांततांडव करण्याची काहीच आवश्यकता नाही. (तुम्ही नाही पवारांच्या चेलेचापाट्यांनी आणि मिडियाने).. उलट यापेक्षाही गंभीर शिक्षा झाली पाहिजे त्यांना या गुन्ह्यासाठी.

>> लोकशाहीत होणाऱ्या हल्ल्यांचे आपल्यासारख्या सुज्ञांनी तरी समर्थन करू नये.

मला सुज्ञ म्हंटलं नाहीत तरी चालेल पण पुन्हा एकवार ठासून सांगतो की कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही नेत्यावर झालेल्या आणि भविष्यात होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचं मी आत्तापासूनच जाणीवपूर्वक आणि साभिमान समर्थन करतो !!

क्षितिज देसाई said...

हा हल्ला (किंवा थप्पड) लोकशाहीत समर्थनीय नाहीच.
पण त्यांनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जे काही केले ते किती लोकशाहीवादी होते ?
हातात पक्षाचे झेंडे घेऊन दुचाकी वरून गरागरा चकरा मारत जबरदस्ती दुकाने बंद करायला लावणे,
कामावरून घरी चाललेल्या लोकांच्या गाड्या रस्त्यात अडवून 'रास्तारोको'च्या नावाखाली धिंगाणा घालणे,
हि कोणत्या प्रकारची लोकशाही ठरते ?

हेरंब said...

क्षितीज, धन्यवाद. तसेही आपले राजकारणी लोकशाहीत समर्थनीय नसलेल्या हजारो गीष्टी रोज करत असतात त्यामुळे ही समर्थनीय नसलेली गोष्टही सहजरीत्या समर्थनीय ठरू शकते. असो..

आणि त्यानंतर झालेला जबरदस्तीचा बंद म्हणजे तर कहर होता. त्या प्रत्येकाच्या एकेक वाजवायला हवी होती !!

chandrashekhar said...

mr. heramb
i am posting this comment a little bit late,but as a matter -of- fact common man,i prefer to react as under
1.your comment reminds me my childhood days,when I used to clap blissfully while watching skeletal heroes beating robust villians in bollywood action movies.
2.As all of us know,nobody ,including the politicians,can be characterised in sheer Black and/or white shade.All of us are human.
3.Did you watch the reaction expressed to media by of Mr. Pawar?
4. I expect your reaction on it.
Baaki chhan !
Pl.find and watch Hindi film Nayak or its original Tamil version,wherein it is aptly shown what happens when a Chief minister offers his post to the Hero for one day

हेरंब said...

Dear Mr Chandrashekhar,

Your point #1 needs more elaboration. I got the meaning of it but not the significance. how does it related in present situation?

#2 Anybody forcing innocent farmers (or anybody for that matter) to end their lives can't be considered as human. I request you to check the definition of human again and then check it against Mr Pawar's character.

#3 Yes. so?

#4 Reacted.

BTW, Nayak is one of my fav movies. Thanks

chandrashekhar said...

herambji
#1 it seems that you differ with the media's narration.According to you, The slap was a reaction and not an attack.You have also justified it in a very forceful way. I liked it.This reminded me the joy I used to get in my childhood days
#2 human means human like you and me who are falliable .
pl reconsider about your statement that the agri. minister or his policies are solely responsible for farmer suiciides. There are several other social,financial and cultural reasons found to various independent study groups working on this vital and serious issue.
# Reaction of Mr.Pawar on this whole issue was to ignore /neglect. He unsuccessfully tried to show that it was a trivial incidence. In fact, it wa not so.
I expected your savory comment on pawar's this attempt
BTW I always enjoy your language precisely venting out your expressions

ANUP said...

हेरंब ,


बऱ्याच दिवसानंतर तुझा Blog वाचला , तुझा " जाळ " हा लेख वाचला . शरद पवार यांच्यावरील हल्ला हा विषय थोडा वेगळाच आहे . आणि मी पण तुझ्या मताशी सहमत आहे कि हा हल्ला भ्याड वगेरे नव्हता ( उलटपक्षी हरविंदर ला bravery award द्यायला लागेल ) ,पण आपण हल्याचे समर्थन कसे करू शकतो ? जर आपण या हल्याचे समर्थन करू तर आपणास नक्षल चळवळीचे पण समर्थन करावे लागेल . तात्त्विक दृष्टीने नक्षल्यांनी चापट ऐवजी बंदुका हातात घेतल्यात . हो त्यांच्या सामान्य माणसांच्या हत्यांसाठी ते दोषीच आहेत पण ते जसे म्हणतात कि त्यांच्यावरील शोषणाविरुध त्यांना हातात बंदुका घ्याव्या लागल्या ...... या गोष्टींच समर्थन होऊ शकत नाही . Political class आजच्या परिस्थितीला जबाबदार आहेच पण थोड्या अंशी आपण पण आहोतच ना ?आपली " चलता है "हि नीती जबाबदार आहे


तू ब्लोग चा शेवट करतना अस लिहिलास कि " त्यामुळे यावर उपाय म्हणून तेवढी ती मतदानाची उदाहरणं वगैरे प्लीज देऊ नका. " . आपल्याकडे एकाच उपाय नाही आहे मतदानाचा , RTI आहे . किती लोकांना माहिती आहे RTI बद्दल तूच सांग , जर माहिती नसेल तर transparency , corruption या विषयी कस काय बोलू शकतो आपण . मी स्वतः RTI वापरला आहे सार्वजनिक क्षेत्रातील recruitment procedure and exams बद्दल, माझ्या शहरातील रस्त्याच्या tender बद्दल ,आणि खरच RTI हे खूप प्रभावी माध्यम आहे. RTI is very good tool to bring transparency , It takes only 10 rupees and a plain application and may be 10 minutes to file the RTI application.

आपल्या घटनेने कारभारासाठी राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा स्वीकारली आहे . आणि या राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेवर वचक राहावा म्हणून "संसद " आहे. आणि संसदीय लोकशाहीसाठी निवडणुका आहेत . आणि त्या आपल्यासाठी आहेत . संसदेने खूप चांगली कामे केली आहेत , याच संसदेने मतदानाचे वय १८ वर आणले . याच संसदेने "शिक्षणाचा अधिकार " दिला आणि याच संसदेने रोजगार योजना दिली .तुझ शेवटच वाक्य ( मतदानाबाबत खटकल ) म्हणून हा लेखनप्रपंच.बाकी लेखाबद्दल काही दुमत नाही. तुम्हाला जर वाटत असेल कि कोणताच लायक उमेदवार नाहीये तर तुम्ही तस मतदानात नोंदवू शकता पण मतदान करायलाच पाहिजे . आपण जर मतदान करत नसू तर खरच ; विचार स्वातंत्र्य ,लोकशाही , पारदर्शीपणा इत्यादी इत्यादी गोष्टींवर आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही.

Think-with-NIL said...

SuperLyk it हेरंब...!!!

well, Anup I have only one question in my mind ( I ask everybody who motivate for voting ) what if all leaders are corrupt or they don't deserve that seat/designation ?
(99.99% times all election candidates are directly/indirectly involved at least one corruption in there career(?) )

we have power of "Vote for nobody"
(http://nilsmania.blogspot.com/2011/04/want-revolution.html)
I have tried above process, If you want to use above process, you have to show your identity to election commission/whoever office of that booth.

I also tried to do this but when I demand for this , lots of supporters of one election candidate start following me and start to take take information of me as well election commissioner also argued me on this.

Now, tell me what can I do for this situation ?

ANUP said...

Hi Nil , well the article of Heramb is good only no doubt about that. And about say negative voting well yes they do ask for the id and all and there is somewhat different procedure to register the "nakaradhikar". And I have used it couple of times , the only problem is our secrecy is at stake(which is against basic principles of right to vote) but such incidences of registering negative voting should increase and then only the election commission will be forced to introduce the negative voting button at the EVM (Electronic Voting Machines ) only. The matter is pending at Supreme court.The problem is there are not suffitient incidences of voters demanding for it.Many of the voters dont know this.
Pls Ref : http://anupdawargawe.blogspot.com/2011/11/wake-up-call.html

And you are welcome for healthy criticization at any time.

हेरंब said...

चंद्रशेखरजी,

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी शरद पवार सर्वस्वी जवाबदार नसले तरी त्या आत्महत्यांची जवाबदारी फार फार फार मोठ्या प्रमाणावर त्यांचीच आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही.

And thanks again for the kind words!

हेरंब said...

अनुप,

उस्फुर्त प्रतिक्रिया म्हणून कानफटात मारणे आणि पद्धतशीर प्लान करून, हाल करून, धाकदपटशाने आदिवासी लोकांना/पोलिसांना ठार मारणे या दोन गोष्टी एकाच तराजूत तोलणं हा माझ्या मते शुद्ध भाबडेपणा आहे. या तुलनेबद्दल तू पुन्हा एकवार विचार करावास ही विनंती.

दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुका आणि मतदानाविषयी. माझ्या मते बऱ्याच जणांचा असा गैरसमज झालाय की मी मतदान प्रक्रियेवर अविश्वास दर्शवतोय. let me clear myself. असं काहीही नाहीये. माझा व्यवस्थेवर विश्वास आहेच. पण एक विनोदी गोष्ट सांगतो. बॉम्बस्फोट झाले आणि त्यावर जनतेने मोर्चे काढले, निषेध व्यक्त केले किंवा मग आण्णांच्या आंदोलनाला पाठींबा दिला किंवा मग अशा कुठल्याही प्रकारच्या घटना ज्यात चुकीच्या गोष्टींचा निषेध म्हणून जनता उस्फुर्तपणे पुढे आली तेव्हा तेव्हा तथाकथित बुद्धीवाद्यांनी एक आणि एकच शस्त्र वापरलंय आणि ते म्हणजे हे असलं काही करण्यापेक्षा मतदान करा. ब्लडी हेल. अरे शहाण्यांनो, शेतकरी उपाशी मारतोय तो आत्ता, तुमच्या निवडणुका आहेत त्या अजून दोन वर्षांनी. तर ही दोन वर्षं माणसाने जगायचं कसं? की असा विचार करत शांत बसायचं की अजून दोन वर्षांनी निवडणुका होणारच आहेत तेव्हा मतदान करू मग आपोआप बॉम्बस्फोट बंद होतील, अतिरेकी हल्ले बंद होतील, उपासमार, महागाई आणि आत्महत्या बंद होतील !! अरे हे असं कधी शक्य आहे का? आत्ता ओढवलेल्या संकटांवर आत्ताच उपाय शोधणं आवश्यक आहे. निवडणुका होईपर्यंत २-३-४ वर्षं थांबा असले सल्ले भरल्यापोटी देणं फार सोपं आहे पण ते जिने अंमलात आणायचं ती जनता अर्धपोटी आहे त्याचं काय? "मतदान करा" हा सल्ला मला आत्ता पाय मोडलाय तर पेनकिलर घेण्यापेक्षा किंवा ऑपरेशन करण्यापेक्षा आयुर्वेदिक काढा घ्या असं सांगण्यासारखं वाटतं (आयुर्वेदाचा अपमान करण्याचा हेतू नाही) पण जिथे आवश्यक तिथे अलोपेथी ही आवश्यकच. सगळ्या समस्या फक्त मतदान केल्याने सुटतील असं मानणं म्हणजे वस्तुस्थितीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणं आहे असं माझं स्पष्ट मत आहे.

आणि अजून एक महत्वाची गोष्ट.. आपल्या देशात निवडणुका कशा मॅनेज केल्या जातात याची कल्पना असेलच तुला. जमलं तर अरविंद अडिगाचं 'व्हाईट टायगर' अवश्य वाच.

तात्पर्य, माझा निवडणूक या गोष्टीवर विश्वास आहे पण त्या प्रक्रियेवर फारसा नाही. आणि मतदान करून सगळ्या समस्या चुटकीसरशी सुटतील या गोष्टीवर मी या जन्माततरी विश्वास ठेवू शकत नाही.

हेरंब said...

धन्यवाद नील.

"Vote for nobody" हा पर्याय प्रत्यक्षात वापरण्यासाठी कितपत शक्य आहे याबद्दल माझ्या मनात शंका आहे. असो.

प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

ANUP said...

प्रिय हेरंब ,

सर्वात प्रथम धन्यवाद , या mail ला उत्तर दिल्याबद्दल. हेरंब तुझा लेख हा योग्यच आहे काही दुमत नाही ,फक्त तो शेवटचा मतदान हा मुद्दा थोडा खटकला होता .तू उपस्थित केलेल्या मुद्द्यांना माझ्यापरीने उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय .
१ . उत्स्फूर्त प्रतिक्रिया : हेरंब तुला माहिती असेलेच नक्षल चळवळ सुद्धा "उत्स्फूर्त प्रतिक्रिया " म्हणूनच सुरु झाली होती.अरे कानफटात चापट आणि नक्षलवाद या दोघांना एका तराजूत तोलायचा प्रयत्न नाही आहे हा. पण दोन्ही गोष्टींच्या मागे "असंतोष" आहे हे अधोरेखित करायचं आहे.आता नक्षलवादी चळवळ मागे "असंतोषापेक्षा" ," बरच" काही आहे हा भाग आहेच आणि तो जनतेलाही चांगलाच ठाऊक आहे.
मला या दोन्ही गोष्त्नीची तुलना करायची नाही पण दोन्ही गोष्टींमध्ये "असंतोषाचा" समान धागा आहे. आणि आपल्यातील रागाला वेगळ्या वाटेने रस्ता करून दिला तर काय होत हे आपण naxalism च्या स्वरूपाने पाहत आहोत. आता तूच पहा १९७० चा काळ किंवा त्यापेक्षा थोडा आधीचा , लोकांनी naxalism ला भरभरून साथ दिली. कारण लोकांच्या मनातील सरकार विरुद्द्ध्चा असंतोष. आता नक्षलवाद हा उपाय नाही अस जनतेला समजल आहे ,पण जनता अडकली आहे असो तो आपला विषय नाही . दुसर उदाहरण "LTTE" ने सुद्धा तामिळी लोकांच्या असंतोषाचा खूप चांगला फायदा करून घेतला होता.किंबहुना LTTE चा जन्म हा उत्स्फूर्त प्रतक्रिया म्हणूनच झाला होता.

मतदान :
१.अरे हो बऱ्याच लोकांचा तुझ्याविषयी गैरसमज झाला आहे [मतदान मुद्द्यावरून :-) बाकी कुठल्या नाही ;-) ]. हे बरोबरच आहे कि मतदान आणि लोकशाही व्यवस्था या बरोबरच आहेत.
आणि हो बुद्धिवाद्यांच म्हणशील तर ते पश्चिमेला सूर्य उगवण्याची वाट पाहत आहेत ( म्हणूनच ते "बुद्धिवादी" आहेत ना ). त्यांच्या आणि सामान्य जनतेच्या " पाठीची" खूप जिवलग मैत्री असते . या "पाठी" नेहमी एकमेकांसामोरच असतात.

आपल्या समोरील प्रश्न :
आता बघ " आत्महत्यांचा प्रश्न " हा खूप विदारक आहे.
पण तू पहा या प्रश्नावर विरोधी पक्षांनी महाराष्ट्र उठवला . मोर्चे ,निषेध ,बन्द आदी सगळे हत्यार वापरले.
इथे नमूद कारावास वाटतंय कि सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही " राजकीयच " वर्गातले. भले विरोधकांना यातून " सत्ता" मिळवायची असेल पण प्रश्न आणि उत्तर दोन्ही " राजकीय " मार्गानेच जात असतात.
२. राजू शेट्टींच उस-दरवाढ आंदोलन घे (सारखीच परिस्थिती.)
३. सध्या "कापूस" पेटला आहे .पण या प्रश्नावरून विधिमंडळ ठप्प आहे.सरकारला आज न उद्या मागण्या मान्य कराव्याच लागतील. पण विधिमंडळ ठप्प करणारे आणि चालवणारे दोघेही राजकीयच.
( आता बघ , सगळ्यात कठीण काळ हा आंदोलन सुरु आणि बंद होण्या दरम्यानचा असतो.एक शेतकरी शेतात कष्ट घेतो आणि मालाला योग्य भाव मिळावा ज्याने करून त्याच घर चालावं हि त्याची अपेक्षा असते भाव मिळत नाही तो आंदोलन करतो .अस मानू कि आंदोलन महिनाभर चालत पण काही शेतकरी असे असतात कि त्यांना हा महिनासुद्धा थांबन शक्य नसत. खूप कुचंबना होते ती याच वर्गाची. आणि आत्महत्या होतात त्या याच वर्गातून .)


मतदान हा रामबाण उपाय असे माझे हि मत नाही :

तूच पहा ना , शरद पवार प्रकरणात आपली राजकारण्याविषयीची चीड व्यक्त होते पण उत्तरासाठी आपल्याकडे "राजकारण" हाच मार्ग आहे. आपल्या घटनेने फार विचार करून राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणा स्वीकारली आहे.
पण आजकालच्या जमान्यात आपण नुसत मतदान करून नाही चालत रे ,सहभाग नोंदवावा लागतो सरकारात .
किती लोकांनी लोकपाल साठी हरकत पाठवल्या संसदेत ? किती लोकांनी जात समाज याचा विचार ना करता मत दिल?
किती लोकांनी RTI वापरला ?
किती लोकांना माहिती आहे "डर्बन" मध्ये climate summit मध्ये काय चालू आहे.? भारताचा काय stand आहे या summit मध्ये ?
या सगळ्या गोष्टी आपल्यावर परिणाम करणाऱ्या आहेत , पण आपला सहभाग नसतो . त्यामुळे पाच वर्षात फक्त एकदा मतदान करा आणि सगळ बरोबर होईल या मताचा मी पण नाही.


टीप : हा मेल टाईप करत असतानाच , स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल कळत आहेत. राष्ट्रवादी पुढे आहे (आतापर्यंत आलेल्या निकालानुसार). आता अस समजायचं का मतदारांनी अण्णांना उत्तर दिले आणि पवारांना पाठींबा.
अस समजायचं का मतदारांनी हरविंदर प्रकरणाला उत्तर दिल आहे.(बुद्धीजीवी अस म्हणतील ही)
काही प्रश्न हे वेगळ्या स्वरूपाचे असतात आणि त्याचं व्यासपीठ हि वेगळ असत.ते ते प्रश्न त्याच व्यासपीठावर सोडवले पाहिजेत. व्यासपीठांची गल्लत करता कामा नये.

Anonymous said...

हेरंब
लौकिकाला साजरा असा आणखी एक जबरदस्त लेख.

पण तुम्ही अमेरिकेत बसून असला लेख लिहिला तिथून भावना व्यक्ता करतात नेत्याना शिव्या घालता.
पण तुम्ही पण या परिस्थितीला जबाबदार आहात असे मला वाटते. तुम्ही इथे भारतात शिक्षण घेता मग उच्च शिक्षणासाठी परदेशी जातात आणि तिथेच राहता. आज राजकारणात एक पण चांगला मुलगा कार्यकर्ता म्हणून जात नाही. कारण तिथे त्यांचा आदर्श असा कुणी व्यक्ती नसते. राहिला प्रश्ना भ्रष्टाचाराचा, दादा आम्हाला पण तुम्हा अमेरिकेवल्यांच्या निदान १०% तरी बरोबरीत राहायला आवडेल. मग जर सरळ मार्ग अवलंबला तर आम्हाला जन्मभर तुमची बरोबरी करता येईल का ?
तुम्ही अमेरिकेला गेले की नातेवाईक सगळे तुमचा अनुकरण करायला लावतात आमचे स्वप्ना म्हणजे तद्दन मूर्खपणा वाटतो कारण हुशारपणा म्हणजे काय याची व्याख्या तुमच्याकडे पाहून केली जाते.

आता म्हणू नका आम्ही आमच्या हुशारी वर गेलो, हुशार तर गरीब पण असतो.

तिथे बसून शिव्या देण्यापेक्षा महाराष्ट्रात येऊन घड्याळ घातलेला हात तोडायाचे प्रयत्न करा.
औषधाला म्हणून पण विरोधी नेते नाहीयेत. या आता वापस ....दाखवा आम्हाला दिशा.

Think-with-NIL said...

@ Anup, @ हेरंब,

I am wondering , after 60 years of freedom we are still facing the problem which was there before 60 years, If elections can change the face of India then why still we are struggling for basic things Thats why we are behind the world.
All our money, time , energy utilized to fulfill(?) basic reqs.


Well, results are roll out, INC(Thappad ka hath)
(when I see there logo I think they are slapping everybody with that hand.)
and NCP(Watch on thappad ka hath)have won most of the seats as usual.

I am really get sad when I see the congress party won the seats , They won because the majority voters of congress are illiterate people and they still thinks this Gandhi(Sonia,Rajiv,Indira) family belongs to mahatma Gandhi.
At lease if we aware them about the reality, 75% votes will be converted to other parties.
and picture can be different.
.
.
.
(all seats will won by NCP...
.
.
Aagitun uthun fofatyat)

Think-with-NIL said...

@ Anonymous...
Good one....
@ हेरंब ...
ball is in your court...
:)
I am not fully agree with Anonymous's comment but he at least 10% right ,isn't it ?

हेरंब said...

अनुप,

आवडली प्रतिक्रिया.. हा विषय जितका ताणू तितका ताणता येण्यासारखा आहे. probably we agree to disagree.. कारण माझं मत अजूनही कायम आहेच की जे झालं ते योग्यच झालं आणि दुसरं म्हणजे मतदान/निवडणुका हे कदाचित उपाय असतीलही पण त्याने कुठलीही समस्या आत्ता, ताबडतोब सोडवता येणार नाही.. असो. पुन्हा एकवार प्रतिक्रियेसाठी आभार!

हेरंब said...

अनामिक धन्यवाद.

पण मला तुमची प्रतिक्रिया नीट कळली नाही कारण निषेध व्यक्त करणं हे भौगोलिक स्थानावर कसं काय अवलंबून असू शकतं? मला तुमचं म्हणणं पटलेलं नाहीच पण तरीही तोच न्याय लावायचा झाला तर मी हे म्हणू शकतो की या सगळ्याला उलट तुम्हीच जवाबदार आहात. भारतात राहता तरी तिथे घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींबद्दल ब्र ही काढत नाही. मी निदान ब्लॉगवर का होईना शिव्या तरी घालतो. थोडक्यात मी तुमच्याविषयी हे असं म्हणणं जितकं भाबडेपणाचं आहे तितकंच तुम्ही मला जवाबदार ठरवणं... असो..

मी यापूर्वी जेव्हा भारतात होतो तेव्हाही अशा आणि याच प्रकारे राजकारण्यांना शिव्या घातलेल्या आहेत. माझं मत परखडपणे व्यक्त करायला मला कपिल सिब्बलच्या बापाचीही भीती नाही. त्यामुळे माझ्या निषेध व्यक्त करण्यामुळे, पद्धतीमुळे, माझ्या भौगोलिक स्थानावरून भारतात घडणाऱ्या सगळ्या अप्रिय गोष्टींसाठी मला जवाबदार ठरवण्याच्या तुमच्या मताचा तुम्ही पुन्हा एकदा विचार करवत ही नम्र विनंती !

हेरंब said...

धन्यवद नील.

>> but he at least 10% right ,isn't it ?

No. not even 1%.. and I've already replied why he is not. Pls check. Thanks.

चैताली आहेर. said...

उशिरा वाचला लेख पण तुझ्या solllid प्रतिक्रियेवरून कळतंय की तू "जिवंत" आहेस...
कारण आजकाल असं आहे ना...
" भेजेसे... कलेजेसे मरोगे तो जीओगे .... रामा रामा....!! "

well said.....!! Kudos...!

हेरंब said...

:) धन्यवाद चैताली..

मंदार जोशी said...

अगदी योग्य लिहीलंयस रे! आवडलंच!!

हेरंब said...

धन्यवाद मंदार.

मनातील काहि said...

हि सामान्य माणसांच्या मनातील वेदना होती, अश्या छोट्या ठिणग्या पडल्या शिवाय जाळ होत नाही....शिवाय "सामान्य माणूस" असे म्हणुन लोकांचे सतत खच्चिकरण करणे नेत्यांनी थांबवले,तरी खुप झाले!!

मी जरा उशीराच आपल्या ब्लॉग वर पोहचले.ब्लॉग आवडला.

हेरंब said...

धन्यवाद 'मनातील काही'..

अशा ठिणग्या वारंवार पडायला हव्यात !!

प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

राफा said...

हेरंब, लेख खूप आवडला कारण त्यातली तळमळ सच्ची आहे. मी प्रतिक्रिया उस्फूर्त देत आहे त्यामुळे काही मुद्दे निसटण्याची किंवा अर्धवट मांडले जाण्याची शक्यता आहे. (लेख उशिरा वाचल्याबद्दल स्वॉरी !)
माझे विचार तुझ्या ब-याच मुद्यांना पुष्टी देणारेच आहेत:

१. कुठलाही हल्ला निषेधार्हच आहे (युद्ध चालू नसताना आणि नि:शस्त्र व बेसावध व्यक्तीवर).. असला पाहिजे. परंतु नेतेही चारित्र्यसंपन्न, आदर्श, लोकांच्या हिताचाच विचार करणारे व राष्ट्रप्रेमी असले पाहिजेत ना ? (लोकशाहीचं माकड व्ह्यायला जबाबदार कोण ह्याविषयी बरेच दिवस ब्लॉग लिहायचा आहे). हल्ला ही प्रतिक्रिया आहे मग मूळातली नेत्यांची कृती (किंवा कृतीशून्यता) ह्याला जाब कोण विचारणार आणि कसा? 'तिजो-यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती' अशीच अवस्था आहे ना.)
२. मला तुझ्या लेखातला सर्वात आवडलेला मुद्दा असा की त्या 'माथेफिरु' कडे लहान चाकू होता आणि तरीही अतिशय संतापूनही त्याने पवारांच्या कानाखाली जाळ (चपखल शब्द !) काढण्याचा पर्याय निवडला. माथेफिरू माणूस संतापल्यावर सर्वात हानिकारक पर्याय नैसर्गिकपणे 'निवडेल' ना ? आपल्याजवळ चाकू आहे आणि हे असेच चालू राहिले तर परिणाम अजून गंभीर होतील हे त्याने देहबोलीतून दाखवलेच ना.
३. त्या 'माथेफिरू' ने हिंसा केली एका व्यक्तिविरोधात. पण जवळ्जवळ सर्व राजकीय नेत्यांबद्दल 'ते चोर, सत्तांध, स्वार्थी व असंवेदनशील आहेत व त्यांना कडक शिक्षा (जेल, जन्मठेप, फाशी वगैरे) दिली पाहिजे' असेच विचार करणा-या नागरिकांना मनोमन वाटते आहे ना?. त्यामुळे भ्याड आपण आहोत, तो 'माथेफिरू' नाही. कारण आपण असे काही कृत्य केले तर यंत्रणा बदलणार नाहीच आपलेच आयुष्याचे नुकसान होईल ह्या भितीनेच कुणी काही करत नाहीये. 'करावेसे वाटत नाही व नेत्यांबद्दल प्रेमादर आहे' म्हणून नव्हे !
४. हुकुमशाहीपेक्षा लोकशाही बरी असे म्हणणे आपल्याला भाग पडते म्हणजे डोकेच फोडून घ्यायचे आहे तर दगडापेक्षा वीट मऊ असे झाले आहे..
ह्म्म्म्म्म्म !

हेरंब said...

धन्यवाद राफा.. सविस्तर प्रतिक्रियेबद्दल विशेष आभार :) ..